विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / सांगली (Sangli): वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट पीजी-२०२५ परीक्षेचा निकाल लागून दोन महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही प्रवेश प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नीट पीजी-२०२५ परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. यावर्षी प्रथमच परीक्षा एका शिफ्टमध्ये पार पडली. १९ ऑगस्ट २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालाच्या आधारे वैद्यकीय पदवीधारकांना एम. डी., एम. एस., डी. एन. बी. (६ वर्षांचा अभ्यासक्रम) आणि पीजी डिप्लोमा अशा विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
यावर्षी एकूण २ लाख ४२ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी २ लाख ३० हजार ११४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. मात्र, प्रवेश प्रक्रिया न सुरू झाल्याने हजारो विद्यार्थी अनिश्चिततेत आहेत.
दरम्यान, अनेक वैद्यकीय महाविद्यालयांनी अद्याप प्रवेश शुल्क जाहीर केलेले नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत. प्रवेशाचे नियोजन, आर्थिक व्यवस्थापन आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन यावर परिणाम होत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थी संघटनांकडून प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
