– येणापूर – मुधोली रस्त्यावर स्कुलबस फसल्याने विद्यार्थी ताटकळले
– खड्ड्यांनी जर्जर झालेला रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (येणापूर) (Gadchiroli): चामोर्शी तालुक्यातील येणापूर ते मुधोली या रस्त्यावर जीवघेण्या खड्डयामुळे नागरिकांचे हाल होत असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोजच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. काल ११ ऑक्टोबर रोजी कॉन्व्हेंट ची स्कुलबस रस्त्यात फसल्यामुळे चिमुकले ताटकळले होते. यामुळे त्यांच्यावर साहेब, आम्ही शिकणार कसे अशी म्हणण्याची वेळ आली होती.
जवळपास १० किमी अंतर असलेला हा रस्ता दुरुस्त करण्याकडे मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या मार्गांवरून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक आजरांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, शेतकरी सर्वांना आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्यात जाणारे असंख्य नागरिक या मार्गाने जातात. दररोज शेकडो वाहने धावत असतात. परंतु मार्गाची अतिशय वाईट अवस्था असल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.
लागतच्या कोणसरी प्रकल्प मध्ये परिसरातील अनेक गावातील युवक नोकरी करतात. त्यांना रात्री अपरात्री कर्तव्यावर जावे लागते. रात्रीच्या वेळी खड्ड्यात दुचाकी जाऊन अनेकजण जखमी होत आहेत. खराब रस्त्यामुळे रापम चे बस चालक सुद्धा त्रस्त आहेत. अनेकदा बासमध्ये गर्दी होते. यामुळे त्यांना मोठ्या कसरतीने बस चालवत आणावी लागते.
काही विद्यार्थी सायकलने येणापूर येथे शिक्षणासाठी येतात. या खड्ड्याच्या रस्त्यामुळे विद्यार्थी सुद्धा वेळेवर शाळेत पोहचू शकत नाहीत. चामोर्शी तालुक्यातील एक महत्वाचा रस्ता असलेल्या येणापूर – मुधोली रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी शासन प्रशासन कधी पाय उचलणार हे अद्यापही कळालेले नाही.
यावर्षीच्या पावसाळ्यात अनेकवेळा बस तसेच इतर वाहने फसलेले आहेत. यापुढेही असेच सुरु राहिल्यास व रस्त्याची दुरुस्ती न केल्यास कठोर पावले उचलावी लागतील. वेळ पडल्यास चामोर्शी – आष्टी महामार्ग अडवून चक्काजाम करू असा इशारा सोमनपल्ली चे सरपंच निलकंठ पा. निखाडे, होमदेव कुरवटकर तसेच परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
झुडूपे वाढली –
या मार्गाच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडूपे वाढलेली आहेत. यामुळे एक चारचाकी वाहन आल्यास दुसऱ्या बाजूने साधी दुचाकी सुद्धा निघणे कठीण होते. रस्त्याच्या बाजूला झुडूपे वाढवून शासनाला महसूल मिळणार आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
