विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम ३१ जुलै होती, परंतु शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिसूचित खरीप पिकांकरिता विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी स्वत: नोंदणी करु शकतात.
तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामूहिक सेवा केंद्र यांचेमार्फत योजनेत सहभागी होता येईल. हिंगणघाट उपविभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन हिंगणघाटचे उपविभागीय कृषी अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी केले आहे.
