विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्याकडे कूच करत आहे. जवळपास सर्वच संघांनी ६-६ सामने खेळले असून उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट होत आहे. यजमान भारतीय संघ १२ गुणांसह आताच्या घडीला क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.
गुरूवारी भारत साखळी फेरीतील आपला सातवा सामना श्रीलंकेविरूद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळेल. याच मैदानावर २०११ च्या अंतिम सामन्यात आशियाईतील हे दोन संघ भिडले होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने श्रीलंकेला चीतपट करून विश्वचषक उंचावला होता. आता या मैदानावर होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली. सामना संपल्यानंतर मुंबईच्या मैदानावर जल्लोष करण्यासाठी फटाके उडवले जाणार नाहीत, असे जय शहांनी सांगितले. जय शहा म्हणाले की, बीसीसीआय पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे. मी हे प्रकरण आयसीसीकडे मांडले असून मुंबईत फटाक्यांची आतषबाजी होणार नाही, जेणेकरून प्रदूषण रोखण्यास मदत होईल. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ होऊ शकते.
मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. याच कारणामुळे शहरातील हवा सुधारण्यासाठी बीसीसीआयने सामन्यानंतर फटाके फोडले जाणार नसल्याचे सांगितले. मुंबई शहरातील दाट धुक्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत.
