Latest Posts

बल्लारपूरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या गोडावूनला भीषण आग : २५ दुचाकी जळून खाक, अग्निसुरक्षेचा अभाव उघड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या मलिक मोटर्स या इलेक्ट्रिक वाहनांच्या गोडावूनमध्ये आज दुपारी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत सुमारे २५ दुचाकी वाहनांचा पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज मलिक यांच्या मलिक मोटर्स या दुकानाच्या गोडावूनमध्ये दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग इतकी तीव्र होती की काही मिनिटांतच संपूर्ण गोडावून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात टीव्हीएस कंपनीच्या सुमारे १५ दुचाकी तसेच ओकाया इलेक्ट्रिक कंपनीच्या सुमारे १० वाहनांचा समावेश असून सर्व वाहने जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशामक विभागाने तात्काळ धाव घेतली. अग्निशामक दलाची दोन वाहने तसेच पेपर मिल येथील एक वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले, अन्यथा आग शेजारील परिसरात पसरून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.

दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशामक विभागाचे अधिकारी शुभम रत्नपारखी यांनी सांगितले की, गोडावूनमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमुळे आग लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच संबंधित गोडावून पूर्णपणे बंदिस्त असून त्याला खिडक्या नसल्याने आग अधिक वेगाने भडकली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित गोडावूनमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेले फायर एक्स्टिंग्विशरच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. तसेच फायर अलार्मचीही कोणतीही व्यवस्था नसल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या घटनेमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या प्रकारामुळे शहरातील व्यावसायिक आस्थापनांच्या अग्निसुरक्षेबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. पोलिस व अग्निशामक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss