– मसाळा येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : राज्यातील वर्धा जिल्ह्यतील महिला बचत गटाची चळवळ ही पहिल्या क्रमांकावर असून येथील बचत गटांनी ही चळवळ केवळ सांस्कृतिक किंवा गटातील महिला कर्ज देण्यापुरती न ठेवता उद्योग निर्मितीकरीता उपयोग करुन दर्जेदार उत्पादन तयार करण्यासाठी करावा असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मसाळा येथे महिला मेळाव्यात केले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान अंतर्गत मसाळा येथील सावित्रीबाई फुले सभागृहात परिश्रम, नारीशक्ती, संघर्ष, जिजाऊ, ग्राम सेवा संघ व ग्राम पंचायतच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, विस्तार अधिकरी तथा मसाळा ग्राम पंचायतचे प्रशासक सुनील गावंडे, महिला विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सितल पंकज भोयर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानचे जिल्हा व्यवस्थापक निरज नखाते, कार्यक्रम व्यवस्थापक स्वाती वानखेडे, मसाळाचे माजी उपसरपंच संदिप किटे, रमाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खाडे, निलेश किटे, कांता भगत आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले वर्धा व सेलू येथे महिला बचत गटाकरीता १८ बचतगट भवन तयार करण्यात आले असून बचतगट भवनाचा उपयोग महिलांनी विविध व्यवसायाच्या प्रशिक्षणसाठी करावा व नाविण्यपूर्ण उत्पादनाची निर्मिती करुन बचत गट सक्षम करण्यास मदत करावी यासाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी उमेदच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी म्हणाले.
यावेळी ज्ञानदा फणसे, सितल भोयर, स्वाती वानखेडे, संदीप किटे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
