विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (chandrapur) : पंतप्रधान यांच्या स्किल इंडिया मिशनशी सुसंगत राहून चंद्रपूर वन अकॅदमीने महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगल परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी हाऊसकीपिंग व फूड अॅण्ड बेव्हरेज सेवा या आदरातिथ्य क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी ही अभिनव योजना सुरू केली आहे. या अनुषंगाने प्रथम या राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
या करारावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी स्वाक्षरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी ६६ दिवसांचा असून प्रशिक्षण, निवास, भोजन व नोकरीची व्यवस्था याचा संपूर्ण खर्च अकादमी आपल्या आंतरिक निधीतून करत आहे. ही योजना वनालगताच्या गावातील तरुणांना सक्षम बनवते, तसेच पर्यायी उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देऊन वनसंवर्धनालाही हातभार लावते.
मेलघाट व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांतील १२ तरुणांचा आठवी हाउसकीपिंग बॅच २० फेब्रुवारी ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत प्रशिक्षणासाठी चंद्रपूर अकॅदमीत उपस्थित होती. आतापर्यंत हाऊसकिपिंग बॅचेस मध्ये एकूण ११० तसेच फूड आणि बेवरेज मधील एकूण ९९ जणांना यशस्वीरित्या प्रशिक्षण करून थ्री, फोर, फाईव्ह स्टार हॉटेल्स, रिझॉर्टमध्ये नोकरी देण्यात आली आहे. तसेच हाउसकीपिंग सहाय्यकाचे दोन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना उदयपूर, लोणावळा, ताडोबा, चंद्रपूर या ठिकाणी जॉब प्लेसमेंट देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक एस के. गवळी यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र, जॉब ऑफर लेटर प्रदान करण्यात करण्यात आले व नेमणूकीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुक्त करण्यात आले.
चंद्रपूर वन अकादमी मार्फत हा कार्यक्रम पुढील तीन वर्षात राबविण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांच्याशी २४ एप्रिल २०२५ रोजी समझोता केला असून त्या अंतर्गत वेगवेगळ्या पाच कौशल्य कामासाठी जसे की, फोर व्हीलर टेक्निशियन असिस्टंट इलेक्ट्रिशियन, वेल्डर, हॉस्पिट्यालिटी असिस्टंट व मल्टी फंक्शन ऑफिस असिस्टंट आणि ब्युटीशियन अशा कौशल्य कामी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण महिलांसाठी देखील उपलब्ध आहे. तरी त्याचा फायदा सर्व संबंधित गावातील तरुणांनी घ्यावा, असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे.
