– जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पडले पार
– भारतीय जैन संघटना (BJS) चा जनजागृतीसाठी पुढाकार
– गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार पोर्टल ची होणार मदत www.shiwaar.com
– आता गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन
– तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : ११ एप्रिल २०२५ ला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना प्रचार रथाचे उद्घाटन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते प्रचार रथाचे उद्घाटन करण्यात आले.
भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाढयुक्त शिवार योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी प्रचाररथ सुरू करण्यात आल्याचे व भारतीय जैन संघटनेच्या या कार्याबद्दल जिल्हाधिकारी कौतुक व्यक्त केले. जिल्हाधिकारी सर्व यंत्रणेला सहकार्य करण्यास सांगितले व या प्रचार रथाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन व सूचना जिल्हाधिकारी यांनी केले.
या उद्घाटन प्रसंगी महेश सेलुकर जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग भंडारा, एस एन चाचिरे जिल्हा जलसंधारण अधिकारी ल.पा.जि.प. भंडारा, एम.एस. चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो, नंदनवार जलसंधारण अधिकारी, नागदिवे जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग, पी.पी. गिडमारे कृषी उपसंचालक, व्ही.एन. कुंभारे मंडळ कृषी अधिकारी तुमसर, ए.जी. तलमले मंडळ कृषी अधिकारी, डॉ. बुधे भूवैज्ञानिक अधिकारी भंडारा, विजय देशमुख कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषभ भुरावत, महावीरजी जैन, राजकुमार बंब तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या वर्षी जोरदार तयारी केली आहे. राज्यातील प्रत्येक गावांच्या तलावातील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणे, नाला खोलीकरण-रुंदीकरण करणे यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजना ताकदीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था या कामांसाठी अर्ज करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पद्धतीनुसार काम करता येईल. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.
शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणे, शेतकर्यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोहोत्सान देणे, जनजागृती करून जनआंदोलन उभे करणे, मागणी अर्ज निर्माण करणे तसेच गाळमुक्त धरण हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज बीजेएस डिमांड अॅप वर ऑनलाइन भरावा. महाराष्ट्रातील बीजेएसचे हजारो स्वयंसेवक, कार्यकर्ते हे बीजेएसच्या माध्यमातून शेतकर्यांना, ग्रामपंचायतींना, तालुका- जिल्हा प्रशासनाला सहयोग करण्यासाठी सज्ज आहेत. या योजनेच्या जनजागृतीसाठी सुहाना स्पाइसेस यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे. योजनेची सर्व माहिती गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या शासनाच्या पोर्टलवर दिली असून त्यासाठी www.shiwaar.com ही वेबसाइट पाहावी. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरण-रुंदीकरणासाठी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या www.shiwaar.com या पोर्टलला जास्तीत जास्त भेट देऊन माहिती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते (भा.प्र.से.) यांनी केले आहे
