Latest Posts

महावितरण ची २४ तास अखंडित सेवा

– वीज खंडित आणि बिलाची समस्या एका कॉलवर करा दूर

विदर्भ न्यूज न्यूज 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): महावितरण ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि सोयीस्कर पाऊल उचलले आहे. आता वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा वीज बिलासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास, ग्राहकांना तीन टोल – फ्री क्रमांकावर संपर्क साधणे अधिक सुलभ होणार आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आता १९१२, १८००२३३३4३५, आणि १८००२१२३२४२५ या तीन टोल – फ्री क्रमांकावर २४ तास कधीही संपर्क साधू शकतील. या क्रमांकांवर केवळ वीजपुरवठा खंडित झाल्याच्याच नव्हे, तर वीज बिलांसंबंधी कोणत्याही तक्रारीची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे आणि त्यांनी वापरलेल्या विजेचे अचूक देयक तयार करणे यासाठी महावितरण नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असते. ग्राहकांच्या मीटरपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी हजारो किलोमीटरचे जाळे कार्यरत असते. अनेक वेळा रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित अडथळ्यांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, ग्राहकांनी त्वरित आणि अचूक माहितीसह तक्रार नोंदविल्यास, महावितरणला तात्काळ कार्यवाही करून वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते.

सध्या अनेक ग्राहक ऑनलाइन तक्रार नोंदवण्याऐवजी थेट कार्यालयात येऊन किंवा दूरध्वनीवरून वैयक्तिक तक्रारींवर अधिक भर देतात. यामुळे यंत्रणेचा बराच वेळ वाया जातो. या पार्श्वभूमीवर, महावितरणने ग्राहकांसाठी हा नवीन आणि सुलभ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हे टोल – फ्री क्रमांक महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि वीज बिलावरही नमूद करण्यात आले आहेत.

तक्रार नोंदवताना ग्राहकांनी आपला १२ अंकी ग्राहक क्रमांक सांगणे आवश्यक आहे. यामुळे बिघाड शोधण्यासाठी लागणारा वेळ वाचतो आणि तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाकडे वर्ग होते. दरम्यान, महावितरणने वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की त्यांनी फोनवर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक तक्रारी करणे टाळावे, जेणेकरून त्यांनाही त्यांचे काम सुरळीतपणे करता येईल.

एसएमएस आणि मिस कॉलद्वारेही तक्रार नोंदणीची सोय –
या टोल – फ्री क्रमांकांव्यतिरिक्त, महावितरणने ग्राहकांसाठी एसएमएस आणि मिस कॉलद्वारेही तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकांनी आपले मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदणीकृत केले आहेत, ते ०२२ – ५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देऊ शकतात. तसेच, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून NOPOWER [ग्राहक क्रमांक] असा संदेश टाइप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविली जाईल आणि ग्राहकाला त्याची माहिती देणारा संदेश प्राप्त होईल.

महावितरणचे संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपचा प्रभावी वापर –

महावितरणने आपल्या बहुतेक ग्राहक सेवा आता ऑनलाइन केल्या आहेत. ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहक एकाच वेळी एकापेक्षा जास्त वीज जोडण्यांची नोंदणी करून त्यांचे व्यवस्थापन करू शकतात. याव्यतिरिक्त, www.mahadiscom.in या संकेतस्थळावरही ग्राहकांसाठी स्वतंत्र ग्राहक सेवा उपलब्ध आहेत. ग्राहक घरबसल्या या आधुनिक सेवांचा लाभ घेऊ शकतात आणि आपल्या समस्यांचे निराकरण करू शकतात, असे महावितरणने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss