विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यानुषंगाने जनजागृती करण्यासाठी तसेच सन २०२४ मध्ये रेशीम उदयोग करण्यासाठी इच्छूक लाभार्थीची नाव नोंदणी करण्यासाठी नागपूर जिल्हयात २० नोव्हेंबर २०२३ से २० डिसेंबर २०२३ या कालावधीत महारेशीम अभियान- २०२४ राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी जिल्हा रेशिम कार्यालय येथे संपर्क साधावा.
रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. जिल्हयातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास भरपूर बाब आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे. परंतु शेतकऱ्यांना उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे जिल्हयातील शेतकरी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आणि तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने राज्यात महारेशीम अभियान २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत नागपूर जिल्हयासह संपूर्ण राज्यात राबविले जाणार आहे.
या अभियानांतर्गत रेशीम शेती म्हणजे काय?, या शेतीचे महत्व, बाजारपेठेची उपलब्धता, रेशीम उदयोगाकरीता असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. रेशीम उद्योग करण्यास इच्छुक लाभाच्यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी या कालावधीत जिल्हा रेशीम कार्यालय, उमरेड रोड, निर्मल नगरी जवळ, नागपूर कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. ९७६६४८३१२४/ ८०८७२२३९५०/ ९८८१६२०६०२ असे आहे.
