विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मुल तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी घडली. मृत शेतकऱ्याचे नाव शेषराज पांडूरंग नागोशे (३८) असे आहे.
मूल तालुक्यातील वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी चितेगाव येथे वाघाने एक गाय आणि एक गोऱ्याला गावात येऊन ठार केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी चितेगाव येथे वाघाने शेतकऱ्यावर शेतात हल्ला केला. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा अशी जोर धरत आहे. चितेगाव येथिल शेषराज पांडूरंग नागोशे यांची उमा नदीच्या परिसरात असलेल्या आपल्या शेतात उन्हाळी भाजीपाला पीकाची लागवड केली आहे. या परिसरात नदीकाठावर बऱ्याच शेतकऱ्यांनी डबल फसल लावली आहे.
सकाळी शेतात पीकाची पाहणी करण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. शेतातील मोटार पंपाजवळच वाघाने हल्ला करून शेषराजला नदीकाठावरील परिसरात ओढत नेले. यावेळी शेषराजचे वडील सुद्धा शेतावर होते. ही घटना परिसरातील शेतकऱ्यांना माहिती होताच त्यांनी गावात येवून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच सावली वनविभागाला कळविण्यात आले. या घटनेने चितेगाव येथे खळबळ उडाली आहे. शेषराव नागोशे यास आई वडील, पत्नी आणि दोन मुली आहे.
या घटनेने शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यातील आकापूर, मरेगाव, एमआयडीसी परिसर आणि चितेगाव या भागात वाघाच्या हल्ले होत असल्याने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. शेषराज हा आपल्या शेतातील भाजीपाला ठोक दराने विक्री करीत होता. या घटनेने नागोशे कुटुंबीयांवर मोठा आघात बसला आहे.
