विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील सिंगणपेठ येथील शेतकऱ्यांना माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते नुकतेच पट्टे वाटप करण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर सनद पट्टे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
अहेरी तालुक्यातील मात्र, मुलचेरा तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट सिंगणपेठ येथील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून सनद /पट्टा मिळावा म्हणून प्रयत्नात होते. मात्र,ते शक्य झाले नाही. येथील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून गावरान जमीनीवर वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांना मालकी हक्क, स्वतंत्र मालमत्ता पत्रक नसल्याने त्यांना कुठलाही लाभ मिळत नव्हते आणि सदर मालमत्तेवर बँक कर्ज मिळणेही शक्य नव्हते. सिंगणपेठ वासीयांची अडचण लक्षात घेऊन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेऊन सदर काम हाती घेतले आणि आपल्या कार्यकर्त्यांना या कामात लावून अखेर सिंगणपेठ वासीयांना सनद/पट्टे मिळवून दिले.
नुलतेच ८ डिसेंबर रोजी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते तब्बल ३८ शेतकऱ्यांना सदर सनद/पट्टे वाटप करण्यात आले. अशक्य झालेले काम शक्य करून दाखविल्याने गावकऱ्यांनी गावात त्यांचे जल्लोषात स्वागत करून आभार मानले.
यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक गुणवंत रणदिवे, शिस्तेदार पंकज आंभोरे, दृष्टांग भुतांगे, अविनाश मडावी, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, महेश बाकीवार, साईनाथ अलवलवार, नागेश करमे, शिवराम आत्राम, सतीश नीखाडे, गणपती डोके, श्रीकांत पाल तसेच लाभार्थी उपस्थित होते.
