– लाभार्थ्यांचा लाभ डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा(Wardha) : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील वर्धा तालुक्यातील लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी २०२५ पासुन अनुदान अर्थसहाय्य केवळ डीबीटी पोर्टल द्वारे थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या शहरी व ग्रामीण शाखेत जमा करावी, असे आवाहन वर्धा तहसिलदार संदीप पुंडेकर यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डि.बी.टी. (DBT) पोर्टलव्दारे करण्यात येणार आहे. सदर योजनेतील लाभार्थ्यांची विहीत विवरणपत्रात माहिती भरुन डि.बी.टी. (DBT) पोर्टलवर अपलोड करुन वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचे सर्व लाभ तातडीने डी.बी.टी. मार्फत लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याच्या मुख्य सचिवांनी सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार जिल्हास्तरावरुन डि.बी.टी पोर्टलवर ऑन बोर्ड (आधार व्हॅलीडेट झालेल्या व आधार व्हॅलीडेट न झालेल्या) लाभार्थ्यांना माहे डिसेंबर -२०२४ व जानेवारी -२०२५ चे अर्थ सहाय्य डि.बी.टी. (DBT) पोर्टल मार्फत देण्यात येणार आहे. तसेच ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पुर्वीच्याच पारंपारीक पध्दतीने (बिम्स प्रणालीव्दारे) अर्थसहाय्य वितरीत करण्यात येईल. बिम्स प्रणालीव्दारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही फक्त माहे जानेवारी -२०२५ अखेरपर्यंत उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रायणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी-२०२५ पासूनचे अनुदान अर्थसहाय्य केवळ डी.बी.टी. (DBT) पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलीडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्यात येणार आहे. तर उर्वरीत ऑन बोर्ड आधार व्हॅलीडेट नसलेल्या तसेच डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी न झालेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य माहे फेब्रुवारी-२०२५ पासुन वितरीत करणे शक्य होणार नाही.
यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपले अद्यावत आधारकार्ड, बँक खाते, आधार व बँक खात्याशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक, अपंग प्रमाणपत्र तसेच जीवन प्रमाणपत्र इत्यादी ची छायाप्रत संजय गांधी निराधार योजनेच्या ग्रामीण व शहरी शाखेत सादर करावी. अन्यथा आपल्या संपुर्ण माहितीची ऑनलाईन डी.बी.टी. पोर्टलमध्ये नोंद घेता येणार नाही. सदर नोंद न झाल्यास संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ बँक खात्यावर शासनाकडुन जमा करणे शक्य होणार नाही. तसेच याबाबत नंतर लाभार्थ्यांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची राहील, असे तहसिलदार वर्धा यांनी कळविले आहे.
