Latest Posts

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्र पडताळणीसाठी संपर्क करण्याचे आवाहन

– प्रवेश घेण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत  वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्याकरिता २५ टक्के प्रवेश आरक्षणांतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवेश पात्र १८५ शाळांमध्ये सदर प्रवेशासाठी राखीव असलेल्या १ हजार ५२७ जागांकरिता ४ हजार १५ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून पहिल्या फेरीमध्ये प्रवेशाकरिता १ हजार ४९१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पालकांना student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्जाची स्थिती, मुळ निवड यादी आणि प्रतिक्षा यादी पाहता येईल. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्या पालकांनी संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी कागदपत्रे पडताळणी करिता संपर्क साधावा, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे  जाऊन पोर्टल संथ होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न कारावा. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत १४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राहील. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात.

तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील. परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही, याची खात्री करावी. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे, याची रिसीप्ट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. प्रतीक्षा यादीतील ‍विद्यार्थ्यानी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.

तरी पहिल्या फेरीत सदर प्रवेशाकरिता निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी सदरचे प्रवेश विहित मुदतीत निश्चित करून घ्यावे, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss