– ४ कोटी ५४ लक्ष ७ हजार ८०९ रुपये तडजोड मूल्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये वर्धा जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १ हजार ८२४ प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य ४ कोटी ५४लक्ष ७ हजार ८०९ इतके आहे.
न्यायालयामध्ये प्रलंबीत असलेले प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करणे हा राष्ट्रीय लोक अदलतीचा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतीमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका यांनी राष्ट्रीय लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम. अली, जिल्हा न्यायाधीश-५ जे. ए. पेडगांवकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, अधिवक्ता मंडळी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत प्रकरणे तडजोडीस पात्र असलेली प्रकरणे निकाली काढण्यास मोठे यश प्राप्त झालेले असल्याचे मत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम. अली यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे असे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका विषद करतांना सांगितले.
वर्धा जिल्ह्यातील न्यायालयामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी १ हजार ५८५ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील तडजोडीची रक्कम ३ कोटी ४८ लाख ५९ हजार ७३५ रुपये इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी २४२ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणामधील तडजोडीचे मुल्य १ कोटी ५ लाख ४८ हजार ७४ इतके होते.
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व वाद दाखल प्रकरणे मिळून एकुण १ हजार ८२४ इतकी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकूण तडजोडीचे मुल्य ४ कोटी ५४ लाख ७ हजार ८०९ इतके आहे.
तसेच या लोकअदालतीचे विशेष बाब म्हणजे जिल्हयातील न्यायालयामंध्ये प्रलंबित असलेली कौटुंबिक हिसाचाराच्या 3 प्रकरणांमध्ये नवरा, बायको मध्ये असलेल्या वादाची प्रकरणे या लोक अदालतीमध्यये निपटारा करण्यात यश प्राप्त झाले.
