विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : देशभरात ८३४ रुग्णांमध्ये केवळ एक डॉक्टर उपलब्ध आहे, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज लोकसभेत दिली. देशभरात सर्वाधिक ८० टक्के डॉक्टर ॲलोपेथिक आहेत. तर ५.६५ लाख डॉक्टर हे आयुर्वेदिक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
देशभरात तज्ञ डॉक्टरांचा अत्यंत तुटवडा भासत आहे. याबाबत सरकारला माहित आहे का? जर हे खरे असेल तर सरकारने त्याबाबतचा आकडा सादर करावा अशी मागणी संसद सभागृहात खासदार दानिश अली यांनी केली होती. त्याला भारती पवार यांनी उत्तर दिले.
रुग्णांच्या जीवाशी खेळ –
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिलेल्या उत्तरावर खासदार दानिश अली यांनी संताप व्यक्त केला. देशभरातील आरोग्य सुविधेची अवस्था अत्यंत दयनीय असून डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांची उपचारांअभावी ससेहोलपट असल्याचे दानिश अली म्हणाले. तसेच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढत असून हा रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे. अशा शब्दांत दानिश अली यांनी संताप व्यक्त केला. जागतिक आरोग्य संघटनेचे आकडे अत्यंत भयावह असल्याचे ते म्हणाले. ॲलोपॅथी म्हणून प्रॅक्टीस करणाऱ्या एक तृतियांश डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय डीग्री नसल्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले.
