Latest Posts

मानवी तस्करी प्रकरण : ईडीचे मुंबई व नागपूरसह आठ ठिकाणी छापे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : कॅनडा आणि अमेरिकेत जवळपास ३५ हजार विद्यार्थ्यांना बेकायदा पाठवण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मानवी तस्करीप्रकरणी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथील आठ ठिकाणी छापे टाकले असून भावेश अशोकभाई पटेल आणि इतर (डिंगुचा प्रकरण) यांच्या विरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. आरोपींनी मुंबई व नागपूरमधील दोन संस्थांमार्फत परदेशी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी करार केल्याचा संशय आहे. या कारवाईत त्यांच्या बँक खात्यातील १९ लाख रुपये गोठवण्यात आले. तसेच दोन मोटरगाड्यांसह संशयित कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.

मुंबई आणि नागपूर येथील दोन संस्थांनी परदेशातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी कमिशनच्या आधारे एका संस्थेशी करार केला आहे. त्यांच्याशी अमेरिकेत कायदेशीररीत्या स्थलांतर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क साधायचे. छाप्यांमध्ये त्यातील एका संस्थेने दरवर्षी २५ हजार विद्यार्थ्यांना व दुसऱ्या संस्थेने १० हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परदेशातील महाविद्यालयांमध्ये पाठवले आहे.

त्याशिवाय गुजरातमधील सुमारे १ हजार ७०० दलाल व देशभरातील ३ हजार ५०० दलाल त्यांच्याशी संबंधित असून त्यातील ८०० जण सक्रिय असल्याची माहिती मिळाली, तसेच कॅनडातील सुमारे ११२ महाविद्यालयांनी एका संस्थेसोबत करार केला आहे, तर १५० हून अधिक दुसऱ्या संस्थेसोबत करार केला आहे. या संस्थांचा या प्रकरणाशी काय सहभाग आहे, याबाबत ईडी तपास करत आहे. १० डिसेंबर व १९ डिसेंबरला ईडीने याप्रकरणी छापे टाकले होते, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.

प्रकरण काय?
गुजरातमधील एक कुटुंब १९ जानेवारी २०२२ ला कॅनडा-अमेरिका सीमेवर मृतावस्थेत सापडले होते. गुजरातमधील डिंगुचा गावातील त्या चौघांना बेकायदेशीररीत्या अमेरिकेत पाठवण्यात आले होते. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी अशोकभाई पटेल व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत आहे. त्यात आरोपींनी अमेरिकेत पाठवण्याचे आमिष दाखवून प्रति व्यक्ती ५५ ते ६० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

मानवी तस्करी कशी व्हायची?
अमेरिकेत पाठवण्यासाठी आरोपी दलाल प्रथम कॅनडातील महाविद्यालयांमध्ये अथवा विद्यापीठांत विद्यार्थ्यांच्या नावाने प्रवेश घ्यायचे. त्यानंतर विद्यार्थी व्हिसावर त्यांना कॅनडाला पाठवले जायचे. तेथे पोहोचल्यावर बेकायदा त्या व्यक्तींना अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडून अमेरिकेत पाठवले जायचे. महाविद्यालयात व विद्यापीठात सहभागी न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शुल्क परत केले जायचे. अशा प्रकारे ही टोळी काम करत होती. पण संबंधित व्यक्ती बेकायदेशीररीत्या अमेरिकेत पोहोचायचे.

Latest Posts

Don't Miss