विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (New Delhi) : शेजारील देश श्रीलंकेमध्ये मोठ्या नुकसानाचे कारण बनलेले दितवाह नावाचे भयानक चक्रीवादळ आता भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पुद्दुचेरीसह काही राज्यांसाठी तातडीचा प्री-सायक्लोन अलर्ट जारी केला आहे.
श्रीलंकेत या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून २३ जण बेपत्ता आहेत. गेल्या २४ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पुराचे प्रकार घडले आहेत. ४३,९९१ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
शाळा बंद करण्यात आल्या, रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या, तर कोलंबो स्टॉक एक्स्चेंजवरील व्यवहारही लवकर थांबवले गेले आहेत. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, श्रीलंकेतील परिस्थिती गंभीर झाल्यास विमानांचे उड्डाण दक्षिण भारतातील त्रिवेंद्रम किंवा कोचीन विमानतळांवर वळवले जाऊ शकते.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ हळूहळू भारताकडे सरकत असून पुढील १२ तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
प्रामुख्याने उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी, दक्षिण आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळच्या किनारपट्टीवर धोका आहे. या भागांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत हवामान अत्यंत खराब राहण्याची शक्यता आहे.
