विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिराेली (Gadchiroli) : एटापल्ली व धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगतच्या पहाडीवर माओवाद्यांचा तळ उध्दवस्थ करण्यात पोलिसांना ३० मार्च रोजी यश आले. यावेळी शस्त्रसाठा व साहित्य जप्त केले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर माओवाद्यांनी पलायन केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवादी सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. गुरूवारीदेखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक झाली. यानंतर २९ मार्चला पहाट अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा येथे अशोक तलांडी या आदिवासी तरुणाचा ताडगावजवळ गळा आवळून खून करत माओवाद्यांनी पत्रक टाकले होते. दरम्यान, पेंढरीपासून १२ किलोमीटरवर पूर्वेला छत्तीसगडच्या मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ ४५० मीटर उंच पहाडीवर माओवादी तळ ठोकून असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ३० मार्च रोजी नक्षलविरोधी अभियान गतिमान केले. अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी- ६० जवानांनी अतिशय खडतरपणे ही अवघड पहाडी पार केली. तेथे माओवाद्यांचा तळ उध्दवस्थ केला. पोलिसांचा आक्रमक पवित्रा पाहून माओवाद्यांनी पहाडीवरुन काढता पाय घेतला. कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक असे साहित्य जप्त केले आहे.
सी- ६० जवान ३१ मार्च रोजी सुरक्षितरीत्या परतले आहेत. छत्तीसगड सीमेवरुन माओवाद्यांचा गडचिरोलीत प्रवेश होऊ नये, यासाठी पोलिस अलर्ट आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत सी- ६० जवानांनी तळ उध्दवस्थ करुन त्यांचा डाव हाणून पाडला. या भागात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान केले आहे. – नीलोत्पल, पोलिस अधीक्षक
