विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्यातील रहिवासी असलेल्या केंद्र किंवा राज्य शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेचा अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता ३५ वर्षे तसेच पीएचडीसाठी ४० वर्षे कमाल वयोमर्यादा आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. पीएचडीसाठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. पदव्युत्तर पदवीसाठी ३ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उर्त्तीण केलेला असावा. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत २०० च्या आत असावी. या योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्याक्रमामध्ये प्रत्येक वेळी उर्त्तीण होणे आवश्यक असून त्यासाठी शैक्षणिक संस्था, विद्यापिठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.
अर्जाचा नमुना शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर उपलब्ध आहे. अर्ज परिपुर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांसह ६ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सक्षम किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्चरोड पुणे येथे सादर करावा. असे समाज कल्याण विभागाने कळविले आहे.
