विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोग शील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकते बाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छा शक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादना मध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
शासन निर्णय क्र. पीकस्पर्धा-२०२०/प्र.क्र.११३/४अे, २० जुलै २०२३ अन्वये रब्बी हंगाम २०२४ मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडईव जवस या ५पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
१) पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके- ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस (एकूण ०५ पिके)
२) पात्रता निकष : – स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.
– स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल.
– पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
३) अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
– विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
– ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
– ७/१२, ८-अ चा उतारा
– जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)
– पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
४) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहिल.
– ज्वारी, गहू, हरभरा, करडईव जवस – ३१ डिसेंबर
– तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल
– प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
५) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क : पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. ३००/- राहील व आदिवासीगटासाठी रक्कम रु.१५०/- राहील.
६) बक्षिस स्वरुप : १) तालुकापातळी- पहिले- ५ हजार, दुसरे- ३ हजार, तिसरे- २ हजार
२) जिल्हापातळी- पहिले- १० हजार, दुसरे- ७ हजार, तिसरे- ५ हजार
३) राज्यपातळी- पहिले- ५० हजार, दुसरे- ४० हजार, तिसरे- ३० हजार
उपरोक्त नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतक-यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.inला भेट द्यावी.
