विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : वरोरा तालुक्यातील चरुरखटी परिसरात करंट लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव कवडु शंकर मोडक (५२) असे असून ते चरुरखटी येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते व शेती तसेच बकऱ्या चारण्याचे काम करीत होते. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ते बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. संध्याकाळी सुमारे पाच वाजता घरी परत आल्यावर त्यांनी बकऱ्या बांधल्या आणि पुन्हा शेताकडे चारा आणण्यासाठी गेले. मात्र ते घरी परतले नाहीत.
घरच्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली परंतु ते सापडले नाहीत. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील गोपीचंद नांदे यांनी मृताचे मुलगा किशोर मोडक याला फोन करून सांगितले की, त्यांचे वडील वामन धाबेकर यांच्या शेतातील पराटी जवळ मृत अवस्थेत आढळले आहेत.
पुढील तपासात असे समोर आले की, संबंधित शेतमालक वामन तुळशीराम धाबेकर (६०), रा. वरोरा यांनी शेतातील पराटीच्या संरक्षणासाठी जंगली प्राणी येऊ नयेत म्हणून विजेचा प्रवाह असलेली लोखंडी तार धुर्याला जोडली होती. या तारेला स्पर्श झाल्याने कवडु मोडक यांचा जागीच मृत्यू झाला.
या निष्काळजीपणामुळे मानवी जीवितहानी झाली असून, मृताचे मुलगा किशोर मोडक यांनी वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी या घटनेचा तपास करून शेतमालक वामन तुळशीराम धाबेकर यांचा विरुद्ध कलम १०५ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. पुढील तपास वरोरा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम करीत आहेत.
