विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शेत जमीन उपलब्ध करुन देण्याकरीता राबविण्यात येते. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शेतजमिन उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर जिल्ह्यात शेती असणाऱ्या इच्छूक शेतकऱ्यांनी समाज कल्याण विभागास शेती विकण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाशी विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
जमीन विक्रीच्या अटी शर्ती –
अर्जदाराने विहीत नमुन्यातील अर्ज समाज कल्याण कार्यालयात सादर करावा. जिरायती जमिनीकरीता ही रक्कम प्रती एकर ५ लाख रुपये आणि बागायती जमिनीकरीता ही रक्कम प्रती एकर ८ लाख रुपये इतक्या कमाल मर्यादेत राहील. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय. समोर, श्रध्दानंद पेठ, नागपूर येथे संपर्क साधावा.
