विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : रेशन कार्ड वर स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणाऱ्या नागरिकांसाठी मोठे बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड संदर्भात १ नोव्हेंबरपासून नियमात बदल करत नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमानुसार आता तांदुळ आणि गव्हाच्या वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रेशन कार्ड धारकांना हे दोन्ही धान्य समसमान देण्यात येणार आहे.
हे नवे नियम एक नोव्हेंबर पासून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार तांदळासह गव्हाच्या वाटपासाठी हे नवीन नियम लागू आहेत. पूर्वी सरकारच्या नियमानुसार रेशन कार्ड धारकाला ३ किलो तांदळासह २ किलो गव्हाचे वाटप करण्यात येत होते. मात्र यामध्ये बदल करत तांदळासह गव्हाचे समसमान वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच आता रेशन कार्ड वर नागरिकांना २ किलो ऐवजी अडीच किलो गव्हाचे आणि ३ किलोऐवजी अडीच किलो तांदळाचे वाटप करण्यात येईल. पूर्वी रेशन कार्ड धारकाला १४ किलो गव्हासह ३० किलो तांदळाचे वाटप करण्यात येत होते. तर नव्या नियमानुसार आता १८ किलो तांदळासह १७ किलो गव्हाचे वाटप करण्यात येणार आहे. हा नियम या १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आला आहे.
ई-केवायसी महत्त्वाचे –
केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर दिली होती. पण अनेक अडचणींमुळे नागरिकांना ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे सरकारने एका महिन्याची मुदतवाढ दिली. तरीदेखील एक नोव्हेंबर पर्यंत अनेकांचे ई-केवायसी झालेले नाहीत. त्यामुळेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी करण्याची तारीख आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
