विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : एका पाठोपाठ तीन लोकांना मारणाऱ्या वाघाला ताबडतोब जेरबंद करा, नाहीतर आम्हाला मारण्याची परवानगी द्या. आपण जंगलात जाऊन त्याला मारून टाकू असा इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या पदाधिकारी यांनी बल्लारपूर वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिला.
रविंद्र नगर वॉर्डातील रहिवासी नामदेव आत्राम यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर लोकांमध्ये वाढत असलेला संताप पाहता शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, उपजिल्हाप्रमुख विनोद उर्फ सिक्की यादव, बाबा साहू, प्रदीप गेडाम, कल्पना गोरघाटे, मीनाक्षी गलगट आदी च्या शिष्टमंडळाने वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांची भेट घेऊन वाघाला लवकर पकडा, आम्हाला आक्रमक होण्यासाठी बळ देऊ नका, अशा कडक शब्दात सांगितले.
त्या वाघाला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी भोवरे यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली आहे. ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काल जसा बिबट्या पकडला तसाच वाघालाही लवकरच जेरबंद करण्याचे आश्वासन दिले.
