विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : आदिलाबाद (तेलंगणा) येथील कापुस व्यापारी संजयकुमार गौरीशंकर अग्रवाल यांस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मीला जोशी – फाळके यांनी काही अटीवर जामीन मंजूर केला आहे. याचीकाकर्ता संजयकुमार अग्रवाल यांची बाजू उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ॲड. फिरदोस मिर्झा, ॲड. अब्दुल सुभान यांनी मांडली.
घाटंजी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आदिलाबाद (तेलंगणा) येथील कापुस व्यापारी संजयकुमार गौरीशंकर अग्रवाल यांना सन २०१५ मध्ये कापुस विक्री केला होता. त्यात मनोज सुचक, छाया मनोज सुचक, बंडू तोडसाम, भाऊराव चव्हाण, परसराम चव्हाण, उस्मान नुर मोंहमद फाजलानी, वैभव मलकापुरे, वामन कडू, जयवंत आडे, संगीता एस. पटले, मोंहमद नुर फाजलानी, रमेश खडसे, ज्ञानेश्वर कडू, सतीश एम. मलकापुरे, रेणुका सिडाम, श्रीकांत पटले, संदीप चोपडे, मधुसूदन चोपडे, शांता एस. मलकापुरे, चेतन दावडा, नरेंद्र दावडा, सुनील कडू, महादेव सिडाम व नरेंद्र दावडा या २४ शेतक-यांनी २५ लाख ९१ हजार ५५१ रुपयाचा कापुस विकला होता.
त्यात श्रीकांत पटले याला ९१ हजार ५५१ रुपयाचा धनादेश देण्यात आला. उर्वरित धनादेश संपुर्ण शेतक-यांकडून मनोज रमणीकलाल सुचक (रा. जलाराम वार्ड, घाटंजी) यांच्या नावाने दि. २६ नोव्हेंबर २०१५ रोजी देण्यात आला होता. ज्याचा चेक क्रंमाक ००००१३ असा होता. सदरचे धनादेश घाटंजी येथील दि यवतमाळ अर्बन को ऑपरेटिव्ह बॅक लिमीटेड, शाखा घाटंजी येथे २६ नोव्हेंबर २०१५ रोजी वटविण्यासाठी जमा करण्यात आले. सदरचे चेक हे सिटी युनियन बँक, आदिलाबाद शाखेचे होते.
५ डिसेंबर २०१५ रोजी ‘निधी कमी आहे’ (FUND IN SUFFICIENT) या कारणास्तव परत आले. त्यामुळे आरोपी संजयकुमार गौरीशंकर अग्रवाल विरुद्ध निगेशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १३८ अंतर्गत मनोज रमणीकलाल सुचक यांनी घाटंजी न्यायालयात खटला दाखल केला. सदर प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सी. एन. ओंडरे यांनी आरोपी संजयकुमार गौरीशंकर अग्रवाल याला एन. आय. ॲक्ट १३८ नुसार २ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व नुकसानभरपाई म्हणून २५ लाख ५० हजार रुपये १ महिण्याचे आंत देण्याचा आदेश पारित केला. सदर प्रकरणात ॲड. नेताजी राऊत (घाटंजी) यांनी फिर्यादीची बाजू मांडली होती.
तदनंतर या शिक्षेविरुद्ध आरोपी संजयकुमार गौरीशंकर अग्रवाल यांनी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी अपील २८/२०१९ दाखल केले. या वेळी आरोपीने ५ लाख १० हजार रुपयाचा भरणा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात केला होता.
सदर प्रकरणाचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी देऊन, आरोपी संजयकुमार गौरीशंकर अग्रवाल यांस ६ महिण्याची साधी शिक्षा व नुकसान भरपाई म्हणून २५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. त्यावर वार्षिक ६ टक्के व्याज देण्याचे आदेश देण्यात आले.
आरोपी संजयकुमार गौरीशंकर अग्रवाल यांची बाजू वरिष्ठ वकील ॲड. फिरदोस मिर्झा (नागपूर) यांनी उच्च न्यायालयात मांडली.
विशेष म्हणजे, यवतमाळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात तातडीने आदेश व्हावा, या साठी मनोज रमणीकलाल सुचक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात न्यायमूर्ती उर्मीला जोशी – फाळके यांच्या न्यायालयात फौजदारी याचिका क्रंमाक ३६/२०२५ दाखल केली होती. तदनंतर याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. चैतन्य कुळकर्णी यांनी सदर याचिका मागे घेतली, हे येथे उल्लेखनीय.
