Latest Posts

आधारकार्ड अपडेट करण्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत विशेष मोहीम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी आपले आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार, ज्या नागरिकांच्या आधारकार्डला १० वर्षे पूर्ण झाली असेल, अशा सर्व नागरिकांनी आधारकार्ड अपडेट करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आधारकार्ड अपडेट करण्यासाठी १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या My Aadhar ssup (https://myaadhaar.uidai.gov.in) पोर्टलव्दारे ऑनलाईन आधार कागदपत्र अपडेट करण्याकरीता पुढील २ महिने म्हणजे १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रणालीमध्ये ऑनलाईन आधार अपडेट केल्यास नागरिकांना कोणतेही  शुल्क १४ सप्टेंबरपर्यंत लागणार नाही. त्यानंतर मात्र आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, याची सर्व नागरिकांनी नोंद  घ्यावी.

जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड  काढलेले आहे. मात्र ज्या नागरिकांनी आधारकार्ड काढून मागील १० वर्षात त्याचा वापर कुठेही केला नसेल, केवायसी  केली नसेल, अशा नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा हे कार्ड बंद होण्याची शक्यता आहे.

आधारकार्ड का अपडेट करावे : आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात, जसे की, पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधारकार्ड नोंदणी झाली असल्याचीही शक्यता असते. आधारकार्डला सबंधितांची  माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदणी अपडेट करणे आवश्यक असते. त्यासाठी १० वर्षांनी आधारकार्ड अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. डेमोग्राफिक अपडेटसाठी (नाव , पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्र. स्वत:चा फोटो, ई-मेल) इत्यादीसाठी ५० रुपये तसेच बायोमेट्रीकसाठी अपडेट ( हाताचे  बोटाचे  ठसे, डोळ्यातील रेटीना  स्कॅन ) साठी १०० रुपये इतके शुल्क निर्धारीत केले आहे.

अपडेटमुळे मिळणाऱ्या सुविधा : आधारकार्ड अपडेट केल्यास अनेक शासकिय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळू शकतो. उदा. जॉब नरेगा कार्ड, पी.एम.किसान योजना, बॅकेतील व्यवहार, प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता धारण, दैनंदिन गरज इ. अपडेट न केल्यास कोणत्याही  शासकिय योजनेचा लाभ मिळण्यापासून नागरिक वंचित राहू शकतो.

आवश्यक कागदपत्रे : मतदार कार्ड , पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, किसान फोटो पासबुक, नरेगा जॉब कार्ड, लग्न प्रमाणपत्र सोबत  फोटो, शाळेचे आय. डी कार्ड, बॅक पास बुक इत्यादी.

पत्ता अपडेटकरीता लागणारी कागदपत्रे : बॅक पासबुक, राशन कार्ड, व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, किसान पास बुक, नरेगा जॉब कार्ड , ईलेक्ट्रिक  बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल, कर पावती, लग्न प्रमाणपत्र सोबत नाव आणि पत्ता, गॅस कनेक्शन बिल.

आधार अपडेट कुठे कराल : सीएससी सेंटर, बॅक, ईंडिया पोस्ट, सेतू केंद्र, अंगणवाडी/बालवाडी या ठिकाणी जाऊन नागरिक आधार अपडेट करू शकतील.

बालकांचे आधार कुठे काढाल : महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही  नोंदणी नि:शुल्क आहे. बालकांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये ५१ संच प्राप्त झाले आहे.

आधार कार्डचा गैरवापर टाळणे : आधार कार्डचा वापर शासकिय कामकाजात/बॅकेसाठी व इतर कामासाठी केला जातो. त्यामुळे त्याचा वापर करीत असतांना गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क आधारचा वापर करावा. मास्क आधारकार्ड काढण्याची सुविधा युआयडीआय पोर्टल वर  उपलब्ध आहे. उदा. ** ** ** १२३४ अश्या प्रकारे आधार कार्ड आपण सदरील वेबपोर्टल वरून डाऊनलोड करून वापरू शकतो, असे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिचंद्र पौनिकर यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss