– प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले ०२ किलो स्फोटक साहीत्य केले नष्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हयात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताहात तसेच इतर प्रसंगी केला जातो. गडचिरोली पोलीस दलाने अश्याच प्रकारच्या माओवादयांचा घातपाताचा मोठा डाव उधळुन लावला आहे.
आज १९ फेब्रुवारी २०२४ रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोस्टे कोटगुल पासुन ५०० मीटर अंतरावर असलेल्या पहाडीच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगल परिसराकडे जाणाऱ्या पायवाटेवर माओवाद्यांनी पोलीस पथकांला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठया प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे, अशी गोपनिय खात्रीशीर माहिती प्रभारी अधिकारी कोटगुल धनंजय कुलकर्णी यांना मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली.
सदर ठिकाणी बीडीडीएस पथकाला बोलविण्यात आले. बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिंग करत असतांना, एक संशयित जागा मिळून आल्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिढ ते दोन फुट जमीनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरुन असलेले प्रेशर कुकर मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे ०२ किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरचं नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या नेतृत्वात पोस्टे कोटगुलचेे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथक प्रभारी अधिकारी मयुर पवार, पोहवा/२४८९पंकज हुलके, पोहवा/१२९६ अनंतराव सोयाम, पोअं/३५२० संचिन लांजेवार व चापोअं/३४१४ तिम्मा गुरनुले यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
