Latest Posts

शाळांमध्ये स्नेहसंमेलन आयोजित करणे गरजेचे : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम

– भगवंतराव आश्रम शाळा राजाराम येथे स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : आजचे युग हे स्पर्धेचे व तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. कारण शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास घडुन येत असतो तर स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो. यामुळे आपल्या अंगी असलेल्या कला प्रदर्शित करण्याची संधी त्यांना प्राप्त होतो. म्हणून शाळांमध्ये स्नेहसंमेलन आयोजित करणे गरजेचे असल्याचे मत माजी जि.प. अध्यक्ष तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केले.

भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था द्वारा संचालित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा राजाराम (खां) येथे स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून येथील सरपंच मंगला आत्राम, ग्रा.प. सदस्य विनायक आलम, खांदलाचे उपसरपंच राकेश सिडाम, सामाजिक कार्यकर्ते तिरुपती कुळमेथे, शारदा आलाम, विजय अंबिलपवार, सत्यवान आलाम, अनिता आलाम, जयराम आत्राम, मुख्याध्यापक एम.व्ही. बासनवार तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

पुढे बोलताना विद्यार्थ्यांनी निव्वळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न राहता आपल्या शालेय जीवनातच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण विद्यार्थीच उद्याचे भविष्य आहेत आणि ही क्रांती आपल्याला घडवून आणायची असेल तर यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

दरम्यान त्यांच्या हस्ते स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग आनंद लुटला. तर, आश्रम शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पी.आर. गोंडाने यांनी केले तर आभार मुख्याध्यापक एम.व्ही. बासनवार यांनी मांडले.

Latest Posts

Don't Miss