विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballapur) : नवतपा दरम्यान सरी कोसळत असल्याने ताप कमी राहत असल्याचा गेल्या काही वर्षांतील अनुभव आहे. यंदा मात्र २५ मे ते २ जून दरम्यान नवतपा दरम्यान असमानी कहर सोसावा लागणार असल्याचे संकेत आहेत. काहीसे ढगाळ वातावरण असले. तरी पारा ४५ अंशाची पातळीही ओलांडण्याची शक्यता आहे.
आज सकाळपासूनच उकाड्याने हैराण केले. दुपारी उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवला. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी एरवीपेक्षा बरीच कमी जाणवली. बाजारांमध्येही ग्राहकांची संख्या रोडावली होती. आकाशात तुरळक ढग असले तरी ताप काही कमी होऊ शकला नाही. शहरात कमाल तापमान ४३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा ०.२ अंशांनी कमी आहे. किमान तापमानही २६.४ अंशांवर पोहोचले असून ते सरासरीपेक्षा ०.५ अंशाने कमी आहे.
विदर्भाचा विचार केल्यास शुक्रवारीही अकोला सर्वाधिक हॉट राहिले. कमाल तापमान ४५.८ अंशांवर पोहोचले आहे. अमरावतीत ४४.०, भंडारा ४२.३. बुलढाणा ४१.५, ब्रह्मपुरी ४५.०, चंद्रपूर ४३.४, गडचिरोली ४२.८, गोंदिया ४१.८, नागपूर ४२.६, वर्धा ४४.२, वाशिम ४४.२ आणि यवतमाळचे कमाल तापमान ४४.५ अंश नोंदविले गेले.
