विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर विविध त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज परत करण्यात आले आहे. अशा परत करण्यात आलेल्या अर्जाच्या त्रुटीची पुर्तता २० मार्च पर्यंत करुन ऑनलाईन परत करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहातील मुला-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ करिता सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात आले होते.
अर्जाची तपासणी केल्यानंतर नवीन अर्जासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड न करणे अथवा कागदपत्रे अस्पष्ट असणे, नुतनीकरण अर्जासाठी मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड न करणे तसेच त्रुटींची पूर्तता न करता अर्ज जसाच्या तसा थेट सादर करणे, अशा प्रमुख विविध त्रुटींमुळे संबंधित विद्यार्थ्यांकडे अर्ज सेंड बॅक करण्यात आले आहेत.
सेंड बॅक झालेल्या सर्व विद्याथ्यांनी https://hmas.mahait.org या नलाईन पोर्टलवर लॉगिन करून आपल्या अर्जातील त्रुटींची ऑनलाईन पुर्तता २० मार्च पर्यंत करावी. त्रुटीपूर्तीनंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह त्या कार्यवाहीची हार्ड कॉपी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वर्धा येथे जमा करणे अनिवार्य आहे. अद्यावत सुचना व योजनेची परिपुर्ण माहितीकरीता https://www.swadharwardha.blogspot.com या संकेतस्थाला भेट द्यावी व त्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या QR कोडने Whatsapp group Join करावा.
जे विद्यार्थी मुदतीत त्रुटीपूर्ती करणार नाहीत किंवा अर्धवट त्रुटीपूर्ती करतील, त्यांचे अर्ज कायमस्वरूपी नाकारले जातील व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची स्वतःची राहील. एकदा नाकारलेले अर्ज पुन्हा विचारात घेण्याची तरतूद नसल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत त्रुटीपूर्ती करावी, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार यांनी कळविले आहे.
